पाकिस्तानवर ठोस कारवाई करण्यासाठी नरेंद्र मोदींना आता ऐतिहासिक संधी !

Published On:
---Advertisement---

पाकिस्तानवर ठोस कारवाई करण्यासाठी नरेंद्र मोदींना आता ऐतिहासिक संधी !

दहशतवाद संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचे केंद्र सरकारला आवाहन

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी भारताकडे ऐतिहासिक संधी चालून आली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात ठोस निर्णय घेऊन कारवाई करणे अपेक्षित असताना सरकार लष्करावर जबाबदारी ढकलत आहे. आता जनतेलाच केंद्र सरकारला सांगावे लागत आहे की, काहीतरी कारवाई करा. अनेक हल्ले झाले, अनेक जण दगावले, पण दहशतवाद काही थांबत नाही. त्यामुळे केवळ श्रद्धांजली पुरेशी नाही, केंद्रसरकारने प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. लोक सरकारसोबत उभे राहतील. सरकारने एक पाऊल टाकावे लोक दोन पावले टाकतील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडत दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या. नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगीप्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 

तसेच पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, अॅड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. नितीन ढेपे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, फारुख अहमद, दिशा शेख, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, सर्वजित बनसोडे, सविता मुंडे, सिद्धार्थ मोकळे, माजी आमदार कपिल पाटील, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

आंबेडकर म्हणाले,पंतप्रधानांनी तिन्ही लष्करप्रमुखांना बोलावून चर्चा केली, मात्र भाजप पक्ष स्तरावर किंवा केंद्र सरकारने कॅबिनेट स्तरावर कोणतीही बैठक घेतली नाही. वर्तमानपत्रांतून केवळ एवढेच समजले की, लष्कराला ‘हवी तशी कारवाई करा’ असे सांगण्यात आले. पण कोणतीही कारवाई ठरावीक प्रक्रिया आणि निर्णयातूनच होते. संपूर्ण जग पाकिस्तानकडे एक आतंकवादी देश म्हणून पाहत आहे. आज निर्णय घेऊन मोदींनी इतिहासात आपले नाव अजरामर करण्याची संधी साधावी. लष्कर सज्ज आहे,पण निर्णय घेणाऱ्या सरकार आणि कॅबिनेटची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे. जर युद्ध खर्चिक बाब आहे, असे सरकार म्हणत असेल, तर आम्ही विचारतो की, तुम्ही ६३ हजार कोटींचे राफेल घेतले, जी २०३० ला येणार आहेत. त्याऐवजी तो पैसा पाकिस्तानविरोधात आजच्या कारवाईसाठी वापरावा. जनतेला सरकारकडून अपेक्षा आहे. त्यामुळे लोक सरकारसोबत उभे राहतील. सरकारने एक पाऊल टाकावे, लोक दोन पावले टाकतील, असेही ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी ऐतिहासिक संदर्भ देत इंदिरा गांधींच्या १९७१च्या निर्णयाची आठवण करून दिली. जेव्हा ४ कोटी निर्वासित बांगलादेशी भारतात आले, तेव्हा भारताचे गोडाऊन रिकामे झाले. इंदिरा गांधींनी जगासमोर ही स्थिती मांडली. अखेर जगाने ठामपणे सांगितले की, हा प्रश्न सोडवा. त्यातूनच बांगलादेश निर्माण झाला. ही संधी त्यांनी ओळखली. आज अशीच ऐतिहासिक संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे, ती त्यांनी साधावी, असे आवाहन आंबेडकरांनी यावेळी केले.

Follow Us On