अडीअडचणी जाणून घेण्यासाठी माजी आमदार दीपकआबा शिरभावी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर
सांगोला/प्रतिनिधी
सांगोला शौर्य

शेतकऱ्यांनी पिकवलं तरच आपण नीटपणे अगदी वेळेवर जेवण जेवू शकतो आणि बळीराजा वाचला तरच देश वाचेल,हा उद्देश नजरेसमोर ठेवून सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी सकाळी ८ वाजताच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील प्रगतशील शेतकरी कांतीलाल अरुण फडतरे यांची आंब्याची बाग तर,प्रगतशील शेतकरी धनाजी लक्ष्मण साळुंखे यांच्या मिरची प्लॉटला भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.यादरम्यान,विक्रमी उत्पादन घेतले म्हणून साळुंखे व फडतरे या बहाद्दर शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावरच त्यांनी फेटा,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की,शेतकऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांना नेहमीच आधार देण्याची भूमिका साळुंखे-पाटील कुटुंबियांनी घेतली आहे.ज्या-ज्या वेळी संकटे आली त्या-त्या वेळी प्रशासनाला बांधावर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही बजावली आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन येथील बळीराजांनी केलेल्या कष्टाला न्याय देण्याची मागणी नेहमीच केली असून याचाच एक भाग म्हणून,सांगोला तालुक्यात शिरभावी हे गाव शेती उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर गाव आहे.येथील शेतकरी बंधू हे जिद्द,चिकाटी व कष्टाच्या जोरावर प्रत्येक उत्पादनात अग्रेसर आहेत.
यामध्येच बहाद्दर शेतकरी धनाजी साळुंखे यांनी २५ गुंठ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे.आत्ता बहार सुरु झाला असून सध्या ९ टन मिरची विक्री केली आहे.यापुढील काळात १५ ते १६ टन मिरची उत्पादन होईल,असे एकंदरीत २५ टन मिरची विक्री होईल,असा त्यांचा अंदाज आहे. यावरुन राज्यात सर्वात विक्रमी उत्पादन घेणारा शेतकरी म्हणून या गावाची ओळख निर्माण झाली असून त्याचबरोबर, माळावरची,दगडाची जमीन फोडून सुपीक करुन त्यामध्ये कांतीलाल फडतरे यांनी आंब्याची बाग लागवड केली आहे.सदरची बाग ही कोकणाप्रमाणे फुलली आहे. सर्वसाधारण एकरी ५ लाख रुपये उत्पन्न घेत असल्याची माहिती फडतरे यांनी दिली असून त्यांची १३ एकर आंब्याची बाग आहे.याही शेतकऱ्याने विक्रमी उत्पादन घेतले असून या बहाद्दर शेतकऱ्यांच्या कष्टाला व त्यांच्या मेहनतीला निश्चितपणाने शाबासकीची थाप मिळावी म्हणून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सदर धनाजी साळुंखे व कांतीलाल फडतरे या दोन्ही कुटुंबीयांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही, यामध्ये दलाली करणारे व्यापारी असून त्यांच्याकडूनही नुकसान होत आहे.शेतकऱ्यांच्या चांगल्या क्वाॅलिटीच्या शेतीमालाला व्यापारपेठ मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.यासह सांगोल्यात पिकणाऱ्या वेगवेगळ्या फळ पिकाला शासनाचे अनुदान मिळावे,अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावर थेट कृषिमंत्री व फलोत्पादन मंत्री यांच्या समवेत चर्चा करुन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी करणार असल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिरभावी गावचे ज्येष्ठ नेते शहाजी दाजी नलवडे,महिला आघाडीच्या नेत्या सखुताई वाघमारे, कृषी सहाय्यक नलवडे,चंद्रकांत शिंदे,सत्यवान फडतरे, संभाजी खेंडकर,भाऊ पवार,अनिल ढोले,विलास नलवडे,पांडुरंग नलवडे,नवनाथ ताटे-देशमुख,अर्जुन शिंदे,विष्णू घोरपडे,माऊली पालकर,आदिनाथ घोडके, नवनाथ मोरे,राजेंद्र ताटे देशमुख,अरविंद नलवडे, आप्पासाहेब नलवडे,घोरपडे सर,बाळासो शिंदे,संदीप चव्हाण,शिवाजी खेंडकर,शशिकांत हिलाळ,भाऊ शिंदे, सूर्यकांत जगदाळे,सुरेश साळुंखे,पोपट रणदिवे यांचेसह शिरभावी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.